सगळंच माफ करायला लागलो तर कपडेच काढून जावं लागेल... - अजित पवार

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने त्यांच्या वेगळ्या वक्तव्याने सतत चर्चेत असतात. आजही त्यांनी शिवनेरी गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर वीज माफीचा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आता सगळंच जर माफ करायला लागलो तर, कपडे काढून मला जावे लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं असा टोला पवार यांनी यावेळी लगावला. ते जुन्नर येथे शिवप्रेमीच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते.


महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यामध्ये 2 लाखांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असून, त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आजच त्यावर निर्णय घेणार असून, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. जे शेतकरी नियमीत कर्ज भरतात, त्यांच्यासाठीही चांगल्या पद्धतीची मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिले. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारीचा विषय गंभीर होत चालला असताना सर्वसामान्यांना जगणं महागात पडले आहे. राज्यात सीएए, एनआरसीच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याऐवजी दुसरेच मुद्दे पुढे आणले जातात. यामधून जातीय वाद निर्माण करून तेढ निर्माण होत होण्याची भीती अजित पवारांनी व्यक्त केली.


महाविकास आघाडीचे सरकार आहे तोपर्यंत जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही


सीएए आणि एनआरसी संदर्भात राज्यात गैरसमज निर्माण करू नये. जोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे आश्वासन अजित पवारांनी दिले. राज्यात कारण नसतानाही वेगळे मुद्दे पुढे आणून चर्चा घडवली जाते आणि त्यातून तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.